Sunday, 14 February 2021


विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व ग्रंथसहवास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
वैदर्भीय समीक्षा विचार परंपरेतील उजळणीवजा चर्चात्मक वाङ्मयीन उपक्रम
-आवर्तन-
डॉ. किशोर सानप यांचा समीक्षा विचार

विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व ग्रंथसहवास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैदर्भीय समीक्षा विचार परंपरेतील उजळणीवजा चर्चात्मक वाङ्मयीन उपक्रम - आवर्तन- डॉ. किशोर सानप यांचा समीक्षा विचार  या उपक्रमांतर्गत  स्वरूप प्रकाशन, औरंगाबादने सन् 2015 मध्ये प्रकाशित केलेल्या समकालीन समीक्षा  जाणिवा आणि भाष्य  या डॉ. किशोर सानप यांच्या समीक्षा ग्रंथावर नागपूरला विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात दि. 20 एप्रिल 2019 शनिवारी चर्चा आयोजित करण्यात आली. वणी विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. दिलीप अलोणी यांनी डॉ. किशोर सानप यांच्या समीक्षा लेखनाची पार्श्वभूमी विशद केली. समकालीन साहित्याचे अभ्यासक व देशीवादाचे साक्षेपी अभ्यासक व नव्या पिढीचे समीक्षक डॉ. राजेद्र नाईकवाडे यांनी डॉ. सानपांचे समीक्षा लेखन मूल्यनिष्ठ, सर्वसमावेश व नवी प्रमेये सिद्ध करणारे असल्याचे वक्तव्य विस्ताराने मांडले. डॉ. सानप मराठीतील प्रमुख भाष्यकार असून देशीवादावर भाष्य करायचे असेल तर सानपांची समीक्षा टाळून पुढे जाता येत नाही, इतक्या उंचीचे लेखन त्यांनी केले आहे.
डॉ. इंद्रजित ओरके यांनी डॉ. किशोर सानप हे पुरोगामी व बंडखोर लेखक व समीक्षक असूनही समन्वयाची नवी वैचारिक परंपरा त्यांच्या समीक्षेत दिसून येते. तथागत गौतम बुध्द-डॉ. आंबेडकर-महात्मा फुले अशा विचारवंतांचा पुरोगामित्वाचा विचार त्यांच्या समीक्षा लेखनातून दिसून येतो. मराठी साहित्य समीक्षा परंपरेत डॉ. किशोर सानपांची समीक्षा नव्या पिढीला दिशादर्शक व पुढचा मार्ग दाखवणारी असून ते एकूणच समीक्षा परंपरेत आपल्या विविधांगी विषयांच्या ठाम प्रतिपादनातून नवी समकालीन मूल्यपरंपरा मांडतात. पर्यायाने पुरोगामित्वाचाच विचार डॉ. सानप समकालीन वास्तवात पुढे नेतात. संत तुकाराम-भालचंद्र नेमाडे-श्याम मनोहर यांच्यासह अनेक समकालीन पिढीच्याही लेखक-कवींच्या साहित्याची साक्षेपी व मूल्यनिष्ठ समीक्षा त्यांनी केलेली आहे. लेखनाला व्रत मानणारे डॉ. सानप तटस्थपणे आपले लेखन करतात आणि समाजाच्या प्रगतीच्या दिशाही त्यातून सूचित करतात.

आर्वनचे आयोजन व पाहुण्यांचे स्वागत दिलीप म्हैसाळकर यांनी केले तर संचालन माधुरी वाडीभस्मे यांनी केले. तब्बल दीड तास आवर्तन सुरू होते. डॉ. किशोर सानप यांनाही दिलीप म्हैसाळकर यांनी विशेष उपस्थिती म्हणून निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला वामनराव तेलंग, मानेकर, विवेक गोखले, कविता सानप, अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अमित गजभिये व जाणकारांची उपस्थिती होती. 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.