Friday, 26 July 2019

DR SANAP SPEECH -डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन साहित्य पुरस्कार वितरण समारंभ...







डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन साहित्य पुरस्कार वितरण समारंभ, नागपूर

डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन,
नागपूर मार्फत दिनांक 23 जुलै 2019 मंगळवार रोजी सांयकाळी 5.30 वाजता श्रीमंत बाबुराव
धनवटे सभागृह, शंकर नगर नागपूर येथे साहित्य पुरस्कार समारंभ डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनचे
अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. विजय कुवळेकर, झी 24 तासचे
प्रमुख संपादक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. स्व. मल्हारराव काळे स्मृती समीक्षा पुरस्कार
डॉ. किशोर सानप; स्व. मिरादेवी पिंचा स्मृती पुरस्कार डॉ. सदानंद देशमुख; डॉ. गिरीश
गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार डॉ. भाऊ लोखंडे; पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना डॉ. विजय कुवळेकर यांच्या हस्ते रोख 25000 रूपये व शाल,
श्रीफळ यासह प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. गिरीशभाऊ  गांधी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ मान्यवरांच्या
हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्तम संचालन, परिचय सौ. रेखा दंडिगे-घिया
व गजानन नारे यांनी केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष श्रीराम काळे व इतरही मान्यवर पदाधिकारी
तसेच नागरिकांची व रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी
आपल्या निर्मितीप्रक्रियेबाबत मनोगते व्यक्त केली. 

डॉ. श्रीकांत तिडके तसेच डॉ.
विजय कुवळेकर यांनी समाज, साहित्य आणि विदर्भाच्या प्रतिभावंतांच्या साहित्यकृतीचे
पदर उलगडून दाखवले. समाजाप्रती लेखकांनी केलेल्या भरीव कामगिरीप्रती पुरस्कार देऊन
समाजानेही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आयुष्यभर
समाजाच्या प्रबोधनाचे कार्य केले त्यामुळेच डॉ. गिरीशभाऊंसारख्या कृतज्ञ व्यक्तिमत्त्वाने
कृतज्ञता सोहळा आयोजित करून आपले सामाजिक व सांस्कृतिक उत्तरदायित्वही पार पाडल्याची
भावना डॉ. कुवळेकरांनी व्यक्त केली.

समीक्षक किंवा टीकाकारही सृजनशील लेखक असतो

डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनतर्फे
डॉ. गिरीश गांधी यांनी पुरस्कृत केलेल्या स्व. मल्हारराव काळे समीक्षा पुरस्काराला
उत्तर देताना काही मौलिक प्रमेये सृजनशील साहित्य व समीक्षालेखनाचा एकास एक अनुबंध
असल्याचे तत्त्व मानताना व्यक्त केली आहेत. समीक्षा व टीका ही परजीवी मानण्याचा प्रघात
असल्याचे आजवर दिग्गज समीक्षकांनीही मानलेले आहे. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सुद्धा
समीक्षा किंवा टीका परजीवी असल्याचे मान्य केले. माझे मत यापेक्षा वेगळे आहे.  समीक्षा किंवा टीका ही परजीवी नसून ती सुद्धा साहित्यकृती-कलाकृतीचे
नावीण्याचे नवेनवे पदर उलगडुन दाखवताना सृजनशीलच असते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी
व रवीन्द्रनाथ टागोरांची गितांजली हे टीका किंवा भाष्यकाव्य असून ती सृजनशील समीक्षाच
आहे. कथा-कादंबरी-कवितेइतकीच समीक्षा किंवा टीकाही सृजनशील असते. मी स्वतः कवी-कथाकार-कादंबरीकार
असून सृजनशील साहित्याचाच निर्माता आहे. पुढे समीक्षेत माझी ओळख समग्र तुकाराम दर्शन
व समग्र नेमाडे यांच्यावरील ग्रंथांमुळे झाली. समीक्षा, संतसाहित्यावरील विवेकवादी
भाष्य आदींमुळे सांस्कृतिकविश्वाने समीक्षक म्हणून शिक्कामोर्तब केला. खरेतर माझ्यातील
सृजनशील लेखक  सर्व वाङ्मय प्रकारात ग्रंथनिर्मिती
करीत असल्याने, माझी समीक्षाही सृजनशील समीक्षाच असते. लेखनाची काही प्रमेय मी मानतो.
1.    कविता-कथा-कादंबरीप्रमाणेच समीक्षाही सृजनशीलच असते. ती परजीवी असूच
शकत नाही. समीक्षक हा सुद्धा समीक्षेची नवीन सृजनशील कलाकृती निर्माण करीत असतो. निदान
मी तरी तसे मानतो आणि अनुभवतोही. साहित्यकृतीपेक्षा समीक्षाकृती ही भिन्न व स्वतंत्र
असते. केवळ साहित्यकृतीवर समीक्षा जगते हा एक मोठा भ्रम आहे आणि तो मराठी सांस्कृतिकविश्वातच
रुढ आहे.
2.    लेखक हा नैतिक व प्रतिभावंत असतो. 
त्याचा स्वतःचा मूल्यविचार तो आपल्या साहित्यकृतीतून मांडत असतो. कधी तो पात्रांच्या
माध्यमाने तर कधी समीक्षेच्या माध्यमाने.
3.    लेखकाची स्वतःची नैतिकता असते. तिचाच आविष्कार साहित्यकृतीतून तो करीत
असतो. सन्मानहौसेत बुडालेले लेखक वरवर कितीही नैतिक व समकालीन असल्याचे भासवत असले
तरी त्यांची न-नैतिकता ओळखणारा काळ हा सर्वात मोठा रसिक असतो.
4.    लेखक हा स्वांतःसुखाय कधीच लिहित नाही. समाजप्रबोधनाचे व्रत व सांस्कृतिक
संवर्धनाचे उत्तरदायित्व त्याला पार पाडावे लागते. सर्वहारा शेवटच्या माणसाला हिंमत
देण्यासाठी तो त्याच्यासोबत उभा असतो.
5.    समीक्षक किंवा टीकाकारही सृजनशील लेखक असतो. हे माझे स्वतःच्या अनुभवाने
सिद्ध झालेले प्रमेय आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.