Sunday, 19 August 2012

loksatta,lokmat,sakal,mata 17-18.8.12

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. किशोर सानप

...
गोंदियात डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या ६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक, कांदबरीकार डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विचारार्थ आलेल्या तीन प्रस्तावित नावांमधून गोंदियाच्या आयोजक संस्थेने डॉ. किशोर सानप यांची एकमताने निवड केली.
किशोर सानप यांनी कादंबरी, चरित्र, कविता, समीक्षा आणि संशोधन कथा इत्यादी वाङ्मय प्रकारात लेखन केले आहे. पांगुळवाडा, हारास, भूवैकुंठ या कादंबऱ्या, युगपुरुष तुकाराम, तुकाराम जीवन आणि कार्य, सावित्रीबाई फुले जीवन आणि कार्य हे चरित्र लेखन, ऋतु हा काव्यसंग्रह, तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, मराठी कांदबरीतील नैतिकता, मराठी प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, मराठी कादंबरी नव्या दिशा, समग्र तुकाराम दर्शन ही समीक्षा व संशोधनात्मक पुस्तके आणि मी अनादिया अस्वस्थ व कोवळी पानगळ हे कथासंग्रह प्रकाशित असून आगामी दहा पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव म्हणून त्यांना बाबा पदमनजी साहित्य पुरस्कार, राज्य शासनाचा दोनदा नरहर कुरुंदकर पुरस्कार, संत साहित्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार, संत तुकाराम साहित्य पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. किशोर सानप हे वध्र्यातील गो.से. वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्राध्यापक असून भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यावरील संशोधनावर त्यांना आचार्य पदवी मिळाली आहे. संत साहित्याचे अभ्यासक, पुरोगामी साहित्य चळवळीचे आणि देशीवादाचे पुरस्कर्ते आणि गांधीवादी विचाराचे अनुयायी म्हणून ते ओळखले जातात. १९९८ मध्ये विदर्भ साहित्य संघाच्या नरखेडमध्ये झालेल्या तिसऱ्या जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. याशिवाय, २००१ मध्ये नाशिकमध्ये संपन्न झालेल्या तिसऱ्या भटक्या-विमुक्तांच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही त्यांनी भूषविले. ७ ते ९ डिसेंबरला गोंदियात ६२ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.See More

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.